Tuesday, 9 February 2016

|| राजे मुजरा ||










चौफेर वारू उधळनाऱ्या अवघ्या मराठीजणांचा स्वाभिमान,
चार शतकांपरी आजही राजे तुम्हीच आमुचा अभिमान.

तुम्हीच बोवलेल्या निर्भिडतेमुळे,
लाभतोय माय मराठीला आज सन्मान.
कित्येक राजे मिरवुनि गेले आजवर,
तरी शिवराय तुम्हीच आमुचे प्रेरणास्थान.

पुन्हा शिवकालीन मावळा नाही होता येत, याचा किंचित वाटतो खेद,
पण, पदोपदी स्मरते तुमचीच शिकवण 'साम-दाम अन दंड-भेद'.

तुम्ही उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची आज फक्त येतेय कीव,
पुन्हा एकदा मावळा व्हावसं वाटतंय, ऒवाळून टाकायला जीव.
राजे, मराठी मुलखाच्या काल-पटावरील कधीच न मिटणारा 'भगवा ठसा' आहात तुम्ही,
माझ्या मराठी मुलखाच्या, मराठी विचारांत, आजही जिवंत आहात तुम्ही.

काफिरांचे सदा परतुनी लाविले तुम्हीच राजे लोट,
सह्याद्रिच्या त्या मराठी इभ्रतेचे तुम्हीच राखिले गड-कोट.
तुम्हीच दिलेल्या सामर्थ्यानं खिळवतोय मी आज, साऱ्या जगाशी नजरा,
नतमस्तक होऊन विनवणी राजे, घ्यावा या मावळ्याचा मुजरा.
 



   

Saturday, 12 December 2015

आम्ही लहानपणी ऐकायचो...










आम्ही लहानपणी ऐकायचो आईकडून,
'बाबा' ऑफिसात काम कि ते करायला जातात. 
दिवस उजाडताच जे उंबऱ्यावर पडतात, 
ते पार, सुर्य मावळल्यावरच त्यांची पाऊले घराकडे वळतात. 
रोजची ही अशी त्यांची दिनचर्या, 
असं वाटतं कि, सुर्याचा वापर ते गजर म्हणुनच करतात. 

आम्ही बापुडे मात्र गजगे, सोंगट्यातच रमणार ना !
आमचं 'काम' ह्या शब्दाशी काय आणि कसलं कर्तव्य ?
बाबा सुद्धा क्रिकेट, बॅडमिंटन मध्ये सवंगडी व्हायचेच म्हणा,
पण आज जाणवतं आम्हाला, बाबांमुळेच तर शिकलोय आम्ही काम आणि कर्तव्य. 

आजही अगदी लख्ख आठवते, आमच्या घरात भरणारी आमची शाळा,
बाबा व्हायचे मास्तर, द्यायला आम्हाला ज्ञान आणि जिव्हाळा. 
आजही आठवतं, कित्येक क्लिष्ट गुंते, त्यांनी अगदी सहज उलघडून आम्हाला उमगावावे,
तर लसावि, मसावि - गुणोत्तर प्रमाण  हे सारं काही रोज अगदी लोणच्यासारखं आमच्या अभ्यासरुपी ताटात वाढवे.
 
लहान असताना कधी वाटलं पण नव्हतं, 
कि तुम्ही पिंजायला शिकवलेले ते ज्ञानाच्या कापसाचे धागे,
पुढे चालून आमच्या आयुष्याचे भक्कम खांब बनतील. 
तर चरित्र, मनन-चिंतन, निर्व्यसनाचे धडे आम्हाला पुर्ण आयुष्यभर पुरतील. 

घरादारासाठी खुप खस्ता खणल्यात तुम्ही मागील कित्येक वर्ष,
फक्त सुखच नव्हे, तर सगळ्यांच्या जीवनात अगदी भरभरून ओतलाय तुम्ही हर्ष. 
आज तुम्ही निवृत्त होताय, 
खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर, आयुष्यातील एक नवं पर्व तुम्ही सुरू करताय. 

तुमचा पुर्ण वेळ आता आम्हा सर्वांना मिळणार, 
हि कल्पनाच अचाट आनंद देणारी आहे. 
काम करून दमलात ना बाबा तुम्ही इतके दिवस,
या आता… विश्रांती घ्यायला घटकाभर,
सारं घर डोळ्याची पार निरांजनं करून तुमची वाट पहात आहे. 
खरंच बाबा, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच… 



 



 



  
 

Tuesday, 1 December 2015

आत्ताच ऊजाडले होते...












तपभर काळोखानंतर कुठे आत्ताच ऊजाडले होते,
नव्या प्रारंभाचे 'पण' मी आत्ता पहाटेच बांधले होते. 
पुर्णत्वाचे उत्स्फुर्त क्षण मज आत्ताच जगावयाचे होते,
पण, विस्तवांचे लाल भडक ढग नभात, आत्ताच का, जमावयाचे होते ?

हवं तसं जगताच नाही आलं कधी !
जगणे हे फक्त विचारांच्या आराखड्यातच राहिले. 
हवं तसं घरटं विनताच नाही आलं कधी,
विणलेले गवताचे तंतु अहंकारातंच विरले. 


काय होतं माझ्या हातात तरी ?
सद्हेतुपुर्वक समजाविण्यापलिकडे. 
कोणा-कोणाला सावरायचं तरी ?
सारंच वाहतं जेव्हा आवरण्यापलिकडे.         

काळ प्रतारणा करून सहज हसला,
मी मात्र, निमग्नपने वादळांचे 'हलाहल' प्यायलो.
आल्हाददायी वेळ निमुटपणे रुसुन बसला,
मी मात्र, नव्या जोमाने त्याला विनवायला, काथ्याकुट करायला उठलो. 


Thursday, 19 November 2015

उरुण पुरेल हे रक्त मराठी...










नाठाळांच्या माथी हाणायला काठी,
उरुण पुरेल हे रक्त मराठी।  
उभं आयुष्य बांधतात आपुलकीच्या गाठी,
सह्याद्रिच्या कड्या-कपाऱ्यातुन सळसळणारे वाघ मराठी ।।  

Wednesday, 4 November 2015

विचार - एका नव्या सुरुवातीचा













मी विचार केला होता एका वेगळ्याच शेवटाचा,
पण आता, पायाच भरावा लागणार आहे, एका नव्या सुरुवातीचा। 
गलबतं तर दिशाहिन होणारंच, जेव्हा वारेच फिरायला लागतात,
घरटी पण पोरकी होणारंच, जेव्हा पाखरंच उडायला लागतात

गावची पायवाटंच बरी होती,
सुखं-दुखात वाटेकरी म्हणुन का होईना, निदान वाटसरू तरी असायचे
काय अवदशा या महामार्गांची,
राव असो वा रंक, एकट्यानेच जगायचे आणि एकट्यानेच मरायचे

का नाहीत ढासळणार विश्वासाचे बुरुज ?
आणखी किती तग धरावी तरी त्यांनी ?
दौलतीचा डौलबाज गड राखायला,
शिलेदार व्हावं ना साऱ्या जीवलगांनी

वर्षानुवर्षे जपलेली नाती, आज एका क्षणात तोडली जातात,
अहंकाराची गाठोडी वाहात, आज लोक जिवंतपणी मरतात
याच साठी का करतात सारा काही अट्टहास ?
सारं कळतं, शिवाय नात्यांमधील मिठहास

शेवटी सारं काही मातीतच जात असलं तरी,
सद्विचारांचे थरावर-थर चढवुन, कर्तुत्वाचा 'टोलेजंग' वाडा मी बांधणार।
कितीही वादळं आली तरी,
पुन्हा नव्याने कल्पकतेच्या काड्यांनी, मायेचा खोपा नवा मी विनणार     

Friday, 23 October 2015

मला कधी कळलंच नाही...














तु का निघुन गेलीस, मला कधी कळलंच नाही । 
तुझ्यानंतर, तुझ्यासारखं कोणी आयुष्यात कधी आलंच नाही ।।
तुझ्याइतकं मन नंतर कधी कुठे रमलंच नाही । 
पहिल्यासारखं हसू देखील नंतर कधी फुटलंचं नाही ।।  
   
कित्येक दिवस झाले, स्वतःला स्वतःच्या नजरेतुन मी साधं पाहिलं पण नाही ।
कारण, काळोखात बळ देणारा आशावादी ऐनक फक्त तुच होतीस ।।
कित्येक दिवस झाले, खुल्या डोळ्यांनी मी पहाटेचं स्वप्न सुद्धा पाहिलं    नाही । 
कारण, सोनेरी पहाटेच्यावेळी लागणारी सुखाची साखरझोप फक्त तुच होतीस ।।

बुचकुळ्यात पडतो मी आजकाल, 'काय तेव्हा करायला हवं होत ?' 
वाट्याला जेवढी आली होतीस, त्यालाच गोड मानायला हवं होत ।।
खरंतर मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपायला हवं होत । 
तु वाट चुकली म्हणुन, काटेरी झालंर तुझ्यासमोर अंथरायला मी नको होत।।

आभाळभर मोकळा श्वास घ्यायचाय मला, कायमचा श्वास थांबण्या-अगोदर । 
मनसोक्त बागडायचंय मला 'आयुष्याच्या रंगमंचावर', रंगनाट्य कायमचं संपण्या-अगोदर ।।
काय माहीत, तुझ्याविना हे सारं काही होणार तरी कसं ?
मीठंच हरवलंय आता, काय माहीत आयुष्याचं वरण चवदार लागणार तरी कसं ।।          

        
 
 

Tuesday, 8 September 2015

तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल...










तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 
नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  
तुला आठवतं?
नदीकाठी आपण फिरायला जायचो,
निळ्याशार  अश्या  पाण्यात आपली प्रतिमा न्याहाळत बसायचो.
निळंशार असं स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात सजायचं,
आणि माझ्या अपयशाच्या ओझ्याने ते नदितंच बुडून जायचं
आजही तु अगदी तसंच, निळ्याशार पाण्यात पाहून इंद्रधनुसारखं स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात सजवंत असशील,
नदीकाठा ऐवजी फक्त एखादा आकर्षक 'Beach' असेल, फरक एवढाच,
पण,  ते स्वप्न त्याच्या गर्भ-श्रीमंतीच्या वावटळीत हरवून तर जात नाही ना ?  
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल
नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  

तुला आठवतं?
आपण देवळात जायचो,
तु गाभाऱ्यात बसुन असायचीस डोळे मिटून, तासनतास...
माझ्या यशासाठी गाह्राणं गात बसायचीस.
मी मात्र देवळाबाहेर तुझी वाट बघायचो,
नशिबापेक्षा कर्तुत्वावरंच जास्त मी विश्वास ठेवायचो.
नास्तिक म्हणून, तु सतत माझ्यावर नाराज होत असायचीस.   
आजही तु तशीच कुठेतरी डोळे मिटून बसत असशील, तासनतास...
देवळाच्या गाभाऱ्या ऐवजी फक्त एखादं महागडं 'Apartment' असेल, फरक एवढाच.
पण त्या गाह्रान्यांचं काय गं ?
आजही त्या गाह्रान्यांत, धुरकटसा तरी मी असतो ना ? 
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 

नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.